चिमुरडीच्या अपघातानंतर रहिवाशांचा पुढाकार
जळगाव (प्रतिनिधी) – खेडीरोडवर असलेल्या माऊली नगरातील चिमुरडीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी व ज्ञानचेतना अपार्टमेंट मधील लोकवर्गणीतून रस्त्यांच्या साईडपट्ट्या बुजवून रस्ता सरळ केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसरात साईडपट्ट्यांच्या कारणास्तव अपघात होणार नाहीत, अशी आशा व्यक्त केली आहे.
माऊली नगरातील ज्ञानचेतना अपार्टमेंट येथील पंकज बोरोले, शशिकांत शिंदे, राहूल महाजन, शंकर पटेल, मुकुंद शर्मा, विकी काळे, नितीन महाजन, शामकांत महाजन, राजेंद्र जगताप या नागरिकांनी पुढाकार घेतला. जेसीबीद्वारे मुरूम व बारीक खडी जमा करून ती महामार्गाच्या साईडपट्ट्याजवळ टाकण्यात आली. त्यामुळे परिसरात साईडपट्ट्या खचण्याचे प्रकार थांबणार आहेत. रस्त्यांना लेव्हल करण्यात आली असून वाहनधारकांना वाहने चालविताना अडचणी येणार नाहीत. महामार्ग प्राधिकरणाने याबाबत लक्ष देऊन सर्व बाजूकडील साईडपट्ट्यांची दुरुस्ती केली पाहिजे, जेणेकरून अपघात होणार नाहीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.