राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांची पत्रकारांना माहिती
जामनेर (प्रतिनिधी) – आजही अनेक बुवाबाबा, महाराज, भगत हे राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणे, भोळ्या भाबड्या नागरिकांची आर्थिक, मानसिक फसवणूक करणे असे कृत्य करीत आहेत. हे कृत्य जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत येते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये दक्षता अधिकारी नेमलेले नसल्यामुळे तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्याबद्दल प्रशिक्षण नसल्यामुळे तातडीने कारवाई होत नाही. यासाठी आम्ही गृहमंत्र्यांची भेटीसाठी वेळ मागितली असून राज्यभरामध्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे व पोलीस पाटलांचे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे (लातूर) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
माधव बावगे हे जामनेर येथे शाखा भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी व प्रल्हाद बोऱ्हाडे, शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, शाखा प्रधान सचिव बी. एन. पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते. पुणे, मुंबई यासारख्या महानगरांत तरुण वर्गामध्ये गुन्हेगारीचे लोण पसरत आहे. त्याबद्दल देखील खंत व्यक्त करताना माधव बावगे म्हणाले की, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्यामध्ये गुन्हेगारी मानसिकता निर्माण होत आहे. भर रस्त्यावर कोयता घेऊन हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच प्रेम व आकर्षण यातील माहिती सांगितली जाणार आहे.
समितीच्या, जोडीदाराची विवेकी निवड, युवा विभाग व महिला सहभाग या तीन विभागांच्या वतीने विशेष कार्यक्रम आगामी काळात घेण्यात येणार आहेत. यात पुण्यात एक विशेष परिषद घेण्याचाही विचार आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यभरामध्ये अनेक बुवा, महाराज अक्षरशः मुंबई व पुणे सारख्या ठिकाणी देखील महिलांचे व नागरिकांचे शोषण करीत आहेत. शोषित नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला जातात. मात्र त्या ठिकाणी जादूटोणाविरोधी कायद्याबद्दल प्रशिक्षण नसल्यामुळे पोलीस त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत नाहीत अशी वस्तुस्थिती महाराष्ट्र अनिसला दिसून आली आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षण वर्ग लावावेत यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती माधव बावगे यांनी दिली आहे. जादूटोणाविरोधी कायदा होऊन दहा वर्षे झाली मात्र या कायद्याबाबतची नियमावली अद्यापही शासनाकडून न झाल्यामुळे पोलिसांना गुन्हे दाखल करण्यात अडचणी येत आहेत असेही निरीक्षण त्यांनी सांगितले.
दरम्यान सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यासाठी देखील जिल्हास्तरीय सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी असावा अशी तरतूद असतानाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे अधिकारी नेमले गेलेले नाहीत, याबाबतही लक्ष त्यांनी वेधले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सध्या संघटना बांधणीवर जोर दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये २२ शाखा असून माधव बावगे हे दोन दिवस शाखा भेटींच्यासाठी दौऱ्यावर आहे. दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असून त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये संघटन अधिक बलशाली करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शोभा बोऱ्हाडे, डॉ. मोहिनी मोरे, नीलिमा फडतरे, सुशीला चौधरी, रमेश गायकवाड, मनीषा निकम, डी.एस.पाटील, आशिष डोहळे, रितेश मोरे, उत्तम पाटील, रामदास सोनवणे, संतोष सराफ, वामन पाटील आदी उपस्थित होते.