धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील तरुण हा धुळे तालुक्यातील शिरपूर येथे फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. दरम्यान शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी त्याचा मृतदेह शिरपूर जवळील सावळदे गावाजवळ असणाऱ्या तापी नदी पात्रात आढळला आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूचे गुढ मात्र अजून समजलेले नाही.
राहुल नामदेव पाटील (वय २२, रा. रोटवद नांद्रा ता. जामनेर हल्ली मु. शिरपूर येथील महाविद्यालयाचे वस्तीगृह) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शिरपूर येथील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयामध्ये एम. फार्म च्या पहिल्या वर्षांमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या चार वर्षापासून तो शिरपूर येथे शिक्षण घेत आहे. २१ जून रोजी त्याची परीक्षा होती. मात्र आजारी असल्यामुळे तो पेपर देऊ शकला नव्हता.
त्याच दिवशी त्याच्या खोलीत असताना तेथून निघून करवंद नाका येथील रिक्षा स्टॉप येथे गेला आणि तिथूनच बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरूच होता. दरम्यान शुक्रवारी २३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शिरपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत राहुल पाटील हा जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथे राहत होता. तेथे त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ हा शेती करतो. ते मूळचे जामनेर तालुक्यातल्या खादगाव येथील आहे. अठरा वर्षांपूर्वी त्यांची जमीन धरण प्रकल्पाखाली गेली होती. त्यानंतर ते नांद्रा येथे राहायला आले आहे. राहुल पाटील यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान गावामध्ये देखील शोकाकुल वातावरण झाले. संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले आहे.
दरम्यान राहुल पाटील याचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस शोध घेत असून आत्महत्या की घातपात याबद्दल गावांमध्ये चर्चा होती.