जळगाव (प्रतिनिधी) – येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना व शाखांना नुकतेच कोल्हापूर येथे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबद्दल त्यांचे समाजातील विविध संघटना आणि मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारणी बैठक कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे २ ते ४ जून दरम्यान घेण्यात आली होती. बैठकीत समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि शाखांनी प्राविण्य मिळविले. प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरस्कारांमध्ये लक्षवेधी शाखा पुरस्कार जळगाव शहर आणि जामनेर यांना मिळाले आहेत तर लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार शहर शाखेतून प्रा.डी.एस.कट्यारे आणि जामनेर शाखेतून प्रल्हाद बोऱ्हाडे यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर लक्षवेधी जिल्हा पुरस्कार देखील जळगाव जिल्ह्याला मिळाला असून प्रथमच अंनिसच्या शाखेला इतक्या स्वरूपात पुरस्कार मिळाले आहेत.
कोल्हापूर येथील बैठकीला जळगाव, अंमळनेर, जामनेर, चाळीसगाव आदी शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील शाखांना व कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, सुनील वाघमोडे, प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना आणि मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.