जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा जळगावचे जिल्हाधिकारी राहिलेले किशोर राजे निंबाळकर यांच्या साधेपणाचा अनुभव जळगावकरांनी सोमवारी पुन्हा एकदा घेतला. “एमपीएससी”चे अध्यक्ष असूनही त्यांनी नवीन बसस्थानक येथील गरिबांचे भोजनालय म्हणून प्रसिद्ध “क्षुधाशांती भोजन केंद्र” येथे जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. मी नेहमीच क्षुधाशांती येथे जेवणाला येत असतो, मला येथे शांती व तृप्ती मिळते, असे त्यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले.
किशोरराजे निंबाळकर यांनी जळगावला जिल्हाधिकारी म्हणून कामकाज केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांचा साधेपणा वारंवार दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने त्यांची जमिनीशी नाळ अजूनही टिकून आहे. आजचे काम आजच संपवावे, यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. मी लोकसेवक आहे, ही मनात भावना ठेवली, तर काम करताना कुठेही, कोणतीही अडचण येत नाही असे ते नेहमी सांगत असतात.
किशोरराजे निंबाळकर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. निंबाळकर साहेब जळगावात दोन दिवसांपासून काही कामानिमित्त आले आहे. सोमवारी त्यांनी जेवणासाठी गरिबांसाठी असलेले क्षुधाशांती केंद्रात जाणे पसंत केले. या ठिकाणी त्यांनी शेवभाजी, बटाटा भाजी पोळी, मट्ठा, नागली पापड अशा खान्देशी साध्या जेवणावर ताव मारला. त्यांच्या सोबत वास्तुविशारद शिरीष बर्वें, शिपाई आणि सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. संधी मिळाली कि, क्षुधाशांती भोजन केंद्रात नेहमी जेवण करण्यासाठी येतो. येथील भोजन मला आवडते. क्षुधाशांती केंद्रातील कर्मचारी चांगली सेवा देतात, असे किशोरराजे निंबाळकर यांनी “केसरीराज” बोलताना सांगितले.