जामनेर (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबातील वृद्धांसहित तरुण मुलाला लाकडी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री गावात घडली आहे. चार जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील चिंचोली पिंप्री गावात यमुनाबाई रतन गोपाळ (वय-६५) या वृध्द महिला आपल्या पती रतन सजन गोपाळ, मुलगा सुभाष रतन गोपाळ यांच्यासह राहतात. दोन महिन्यांपुर्वी सुभाष गोपाळ याचे गावात राहणारे अर्जून दादाराव गोपाळ यांच्याशी किरकोळ भांडण झाले होते. या रागातून २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सुभाष गोपाळ हा घरी असतांना अर्जून दादाराव गोपाळ, देविदास दादाराव गोपाळ, पवन संतोष गोपाळ आणि सुनिल संतोष गोपाळ सर्व रा. चिंचोली पिंप्री ता. जामनेर यांनी सुभाष गोपाळ, रतन गोपाळ आणि यमुनाबाई गोपाळ यांना लाठ्याकाठ्या आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.
मारहाणीत यमुनाबाई गोपाळ याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शनिवारी ६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता यमुनाबाई गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जून दादाराव गोपाळ, देविदास दादाराव गोपाळ, पवन संतोष गोपाळ आणि सुनिल संतोष गोपाळ सर्व रा. चिंचोली पिंप्री ता. जामनेर यांच्यावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन सोनेने करीत आहे.