जळगाव (प्रतिनिधी) – खारघर दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजकांवर म्हणजेच राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी तसेच, दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत सोमवारी २४ एप्रिल रोजी करण्यात आली.
खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम केवळ दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी दुपारी भर उन्हात ठेवला गेला. देशाचे गृहमंत्री अमित शहा भाषण करीत असताना अनेक लोक चक्कर येऊन पडत होती. तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतून नेले जात होते. तरीही भाषण सुरूच होते. हे भारतीय लोकशाहीला न शोभणारे आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला.
खारघर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र ती दडविण्यात आली आहे. राज्य सरकार संवेदनाहीन झाले असून या राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही प्रदीप पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शहराध्यक्ष शाम तायडे उपस्थित होते.
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच ; १ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास