मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून चार दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. १३ मार्चपासून ते १७ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. गारपीट आणि अतिवृष्टी मधून जी काही पिके वाचली आहेत त्या पिकांना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च पासून ते १६ मार्च पर्यंत जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे. तसेच १५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पाऊस हजेरी लावू शकतो. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये वादळी वारा देखील वाहणार आहे.
४ मार्च ते ८ मार्च दरम्यान राज्यातील पुणे अहमदनगर, नासिक, धुळे, छत्रपती संभाजी नगर यासह विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट सदृश्य पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके भोई सपाट झाली. हरभरा, गहू, केळी, पपई, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या शेती पिकांना याचा फटका बसला.