जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील रहिवासी दोघे भावांनी बँकेतून पासबुक भरून आणतो सांगून एटीएमद्वारे विनापरवानगी परस्पर बहिणीच्या खात्यातून पाच लाख रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.
शिरसोली येथील रहिवासी शबनम शेख जाकीर पिंजारी या व त्यांचे पती इंजिनिअर असून कामानिमित्त ते सन २०१२ ते २०२१ पर्यंत सौदी अरेबिया येथे होते. शबनम शेख या सुध्दा २०१२ ते २०१८ पर्यंत तेथे राहत होत्या. त्या अधून-मधून शिरसोली येथे गावी येत होत्या. गावी आल्यावर पैशांची आवश्यकता भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढून घेत होत्या. त्यावेळी त्यांचे दोन्ही भाऊ मेहमुद शमसोद्दीन पिंजारी (५२) व अशपाक शमसोद्दीन पिंजारी (४२, दोन्ही रा. शिरसोली) हे सोबत येत होते. २४ जुलै २०१७ रोजी शबनम शेख या घराची चावी मोठा भाऊ अशपाक याला देऊन पुन्हा सौदी अरेबियासाठी निघून गेल्या. २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी शबनम यांच्या पतीने त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रूपयांचा भरणा केला. तो भरणा झाला आहे की नाही तपासण्यासाठी त्यांनी पत्नीचा भाऊ अशपाक याला बँकेत जाण्यास सांगितले. दुस-या दिवशी अशपाक याने रक्कम जमा झाल्याचे कळविले. त्यानंतर अशपाक व मेहमुद याने बहिणीच्या घराच्या कपाटातून एटीएम काढून त्याद्वारे बँकेतील पाच लाख रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. २६ सप्टेंबर २०१८ रोजी शबनम या पुन्हा गावी परतल्या. त्यावेळी त्यांना दोन्ही भावांनी परस्पर विनापरवानगी रक्कम काढून घेतल्याचे कळाले. त्यांनी ती रक्कम परत करण्याचे सांगितले. मात्र, रक्कम परत केली नाही.
भावांनी परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे शबनम यांनी पती जाकीर शेख सांगितले. त्यानंतर जाकीर शेख यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी पत्नीच्या दोन्ही भावांकडे पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी त्यांना धक्काबुक्की करित शिवीगाळ केली. जाकीश शेख यांनी पोलिसात धाव घेतली. पण, तक्रार नोंदवून घेतली नाही.अखेर शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावेळी शबनम पिंजारी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या दोन्ही भावांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.