चार दिवसांनी जिल्हा पेठ पोलिसांना मिळाले यश
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दोन सख्ख्या बहिणी सोमवारी बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी तपास लावून अखेर चार दिवसांनी दोन्ही मुलींना पुण्यातून तीन मुलांसह ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. दरम्यान प्रेम प्रकरणातून त्यांचे पलायन झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
तालुक्यातील १९ वर्षीय व १६ वर्षीय बहिणी ५ सप्टेंबर रोजी जळगावात आल्या होत्या. १९ वर्षीय तरुणी जळगाव येथील एका महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तर १६ वर्षीय बहीण ग्रामीण भागात अकरावीचे शिक्षण घेत आहे.
दरम्यान दोन्ही बहिणी जळगावला काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्या एसएनडीटी महाविद्यालयमध्ये गेल्या होत्या. तेथून त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे चिंताक्रांत होऊन अखेर पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली होती.
पोलिसांनी चार दिवस अथक तपास करून त्यांचा माग काढला. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींचा शोध घेण्यात आला. अखेर दोन्ही मुली पुण्यामध्ये आढळल्या तर त्यांच्यासोबत ३ संशयित तरुणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
वैद्यकीय तपासणी करून यातील मोठ्या बहिणीला शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात तर लहान बहिणीला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जयेश देविदास सोनवणे (वय १९), हितेश रामसिंग शिरसाठ (वय २०) विवेक सुनील नन्नवरे (वय २१) सर्व रा. बांभोरी ता. धरणगाव अशा तिघांना अटक केली आहे. तपास एपीआय आर.डी. पवार करीत आहेत. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.