तापी नदीच्या काठावर पाय घसरून झाला होता बेपत्ता
प्रशासनाचे असहकार्य : नातेवाईकांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवासी मनोज भाऊलाल पाटील (वय ४२) हा शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या तापी नदीत पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेला होता. काठावर त्याचा पाय घसरून तो ४० ते ५० फूट खोल पाण्यात बुडाला. २२ तासांच्या वर होऊनही अद्याप त्याच्या मृतदेह मिळून न आल्यामुळे तसेच प्रशासनाची कुठलीच मदत होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मनोज भाऊलाल पाटील (वय ४२) हे त्यांच्या परिवारासह थोरगव्हाण येथे राहतात. शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ यांच्यासह ते राहतात. शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ते तापी नदीच्या काठावर बैल घेऊन धुण्यासाठी गेले होते. त्याचवेळी काठावर त्यांचा पाय घसरून ते नदीत बुडाले.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला देखील कळविले. अद्याप पर्यंत २२ तास होऊनही त्यांचा मृतदेह अद्यापही मिळालेला नाही. याबाबत नातेवाईकांसह गावकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. प्रशासनाचे अद्यापही कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.