औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
जळगाव (प्रतिनिधी) : ऐन पोळ्याच्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे शेतकऱ्याच्या घरी दुःखद घटना घडली आहे.तलावावर बैल धुण्यासाठी नेला असताना काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे.
पोळा सणानिमित्त फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे तलावावर बैलाला धुण्यासाठी नेले असताना त्या ठिकाणी तलावात बुडून (पंढरीनाथ कचरू काळे वय ३४) यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचण्यासाठी गेलेला पुतण्या रितेश अजिनाथ काळे (वय १८) याचाही पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या मदतीने दोघांचाही मृतदेह पाण्याबाहेर काढून फुलंब्री येथील रुग्णालयात देण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोघांवर अंत्यसंस्कार झाले. पंढरीनाथ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा तर रितेशच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक आरती जाधव तपास करीत आहेत.