जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शिवाजी नगरात घरात मुले अभ्यास करत बसलेली होती. तर दुसरीकडे मुलांच्या पाठीमागे पलंगावर झोपलेल्या त्यांच्या वडीलांनी काही क्षणातच पंख्याला रुमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आवाजामुळे मुलांच्या लक्षात हा प्रकार आला. घाबरलेल्या मुलांनी घराबाहेर जाऊन ही घटना परिसरातील नागरिकांना सांगितली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सोमवारी 12.30 वाजता शिवाजीनगरात ही घटना घडली. समाधान रामदास सुरवाडे (वय 45, रा. काळेनगर, शिवाजीनगर) असे मृताचे नाव आहे.
सुरवाडे यांना दम्याचा आजार होता. त्यामुळे ते प्रचंड त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस बाहेरुन काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी पाठवले. यावेळी घरात त्यांची मुले प्रेम व करण हे दोघे अभ्यास करीत बसले होते. त्यांच्या पाठीमागे सुरवाडे हे पलंगावर झोपले होते. काही क्षणातच सुरवाडे यांनी पंख्याला रुमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी झालेल्या आवाजामुळे दोन्ही मुलांच्या लक्षात हा प्रकार आला.
वडीलांनी गळफास घेतल्याचे दृष्य पाहुन दोघे मुले घाबरली, घराबाहेर येऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना ही माहिती सांगितली. शिवसेनेचे शिवाजीनगर विभागप्रमुख विजय बांदल यांच्यासह काही लोकांनी सुरवाडे यांच्या घरी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. यानंतर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी ओमप्रकाश सोनी, नितीन अत्तरदे व दिनेश कंखरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दुपारी तीन वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. मृत सुरवाडे यांनी आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मृत सुरवाडे यांच्या पश्चात पत्नी राधिका, आई, मुले भारत, प्रेम व करण असा परीवार आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.