मुंबई ( वृत्तसंस्था ) – मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी बस धामनोद येथील खलघाटाजवळ खळखळणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. रात्री 10 ते 10.15 च्या दरम्यान खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाली. चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली.
बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत एकही प्रवासी जिवंत सापडला नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना म्हणाले की, बस अपघाताची घटना अतिशय दुर्दैवाची आहे. मी दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. ते स्वत:देखील या घटनेविषयी गंभीर आहेत. एक मंत्रीदेखील त्यांनी तेथे नेमलेले आहेत. राज्य शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करत असून शासन मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील आहे.
या दुर्घटनेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मीसुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो.