मुंबई ( प्रतिनिधी ) – देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतील. महाराष्ट्रात भाजपकडून सत्ता स्थापनेसाठीचा दावा कधी करण्यात येईल, या प्रमुख मुद्दयावर या भेटीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला असताना शिंदे गटातील आमदारांवरची अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील आव्हाने कमी झाली आहेत. भाजपच्या गटातील हालचालीही वाढल्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल सागर बंगल्यावर झाली. त्यात महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय..
50 आमदार घेऊन शिंदे गट बाहेर पडलाय. या गटाने पाठिंबा काढल्यास कधीही सरकार कोसळेल एकनाथ शिंदे गट अजूनही उद्धव ठाकरे सरकारला भाजपाशी युती करण्याची कळकळीची विनंती करत आहे. गुवाहटीतील आमदारांनी महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला तरी भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करू शकते. मात्र गुवाहटीतील आमदार महाराष्ट्रात आले नाही तरीदेखील भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल, त्यानंतर शिवसेनेवर नाराज असलेल्या गुवाहटीतील आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी महाराष्ट्रात यावे लागेल. त्यामुळे दोन्हीही प्रकारे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बनण्यासाठी भाजपा नेत्यांची पूर्ण तयारी झाली आहे.
गुवाहटीतील शिंदे आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी येईल, हे अद्याप निश्चित नाही. देवेंद्र फडणवीस रविवार ते सोमवारी सत्ता स्थापनेसाठी दावा करून नवं सरकार स्थापन करतील , अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.