बोदवड ( प्रतिनिधी ) – नाडगाव महसूल मंडळातील १८ गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई अनुदान सरसकट मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे .
संपूर्ण बोदवड तालुक्यात पिक विमा रक्कम वाटप व आणेवारी ५० पैशांच्या आत लावणेबाबत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने तहसीलदार यांना आज निवेदन दिले दिले राज्यात आक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून पिकांचे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले. बोदवड तालुक्यातील नाडगाव महसूल मंडळातील नाडगाव, नांदगाव, सोनोटी, जुनोने, हिंगणे, आमदगाव, शिरसाळा, कोल्हाडी, वरखेड
खुर्द, वरखेड बु. राजुर एणगाव, निमखेड, हरणखेड, घाणखेड, पळासखेडे खुर्द, चिंचखेड सिम येथील शेतातील कापूस या मुख्य पिकासह अन्य पिकांचेदेखील मोठया प्रमाणात नुकसान झाले.
यावेळी शेतकऱ्यांची मागणी असतांनादेखील स्थानिक पातळीवर पंचनामे न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे नाडगाव महसूल मंडळातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीत झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदानाची शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तातडीने रक्कम सरसकट जमा व्हावी, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी, व तालुक्यातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत लावण्यात यावी असे निवेदन तालुकाध्यक्ष श्रावण बोदडे यांनी दिले आहे.या मागण्यांसाठी ३ जानेवारीपासून तहसिल कार्यालयासमोर तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.