जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानास जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सावदा येथे शुक्रवारी ५१ शेतकऱ्यांनी ३३ लाखांचे वीजबिल भरून ते कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त झाले . महावितरणच्या जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सावदा विभाग कार्यालयात शेतकऱ्यांशी अधीक्षक अभियंता फारूक शेख व कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी संवाद साधत महाकृषी ऊर्जा अभियानाचे महत्त्व पटवून दिले. कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी आहे. चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या आवाहनास प्रतिसाद देत सावदा विभागातील ५१ शेतकऱ्यांनी ३३ लाख २४ हजार ६२० रुपयांचे वीजबिल भरले
रावेर उपविभागातील ७ शेतकऱ्यांनी ३ लाख ३३ हजार ३७० रुपये, यावल उपविभागातील ७ शेतकऱ्यांनी ८ लाख ३४ हजार ७८० रुपये, फैजपूर उपविभागातील ३ शेतकऱ्यांनी २ लाख ४८ हजार ४२ रुपये तर सावदा उपविभागातील ३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ८ हजार ५० रुपयांचे वीजबिल भरले या सर्व ग्राहकांचा अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वसुलीसाठी प्रयत्न केल्याबद्दल कुंभारखेडा शाखेचे कनिष्ठ अभियंता विशाल नेमाडे व तंत्रज्ञ गुरुदास पाटील , रावेरचे तंत्रज्ञ लीलाधर कोळी यांचाही शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय अभियंते राजेश नेमाडे (सावदा), दिलीप मराठे (यावल), अनिल पाटील (रावेर) व राकेश फिरके (फैजपूर), सहायक अभियंता देवेंद्र भंगाळे, नीलेश भंगाळे, धनंजय चौधरी, मिलिंद इंगळे यांनी वीजबिल वसुलीसाठी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून ६६ टक्के निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.