चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या आणि गेल्या वर्षभरात आत्महत्या केलेल्या तालुक्यातील ८ शेतकऱ्यांच्या वारसांना १७ लाखांच्या मदतीचे धनादेश आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात गोरखपूर येथील सोमनाथ राठोड, पोहरे येथील गोरख माळी व पातोंडा येथील चंदू गायकवाड या तिघांना जीव गमवावा लागला होता. या तीनही मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये प्रमाणे १२ लाखांच्या मदतीचे धनादेश आज देण्यात आले तालुक्यात वर्षभरात कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवणाऱ्या दहीवद येथील ज्ञानेश्वर पाटील, वाघळी येथील दिलीप धनगर, शिरसगाव येथील दादाजी काकळीज, पातोंडा येथील दिनेश पाटील व ब्राम्हणशेवगे येथील दत्तू शिर्के या ५ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख प्रमाणे ५ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे वितरीत करण्यात आले.
यावेळी मृतांच्या वारसांसह प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती माजी सभापती दिनेश बोरसे, नगरसेवक रामचंद्र जाधव, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, पोहरे येथील सरपंच काकासाहेब माळी, पंजाबराव अहिरराव आदी उपस्थित होते.