जळगाव ( प्रतिनिधी ) – निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढवण्यासाठी मतदार नोंदणीबद्दल नागरीकांमध्ये जागृती करतानाच मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे लक्ष्य गट निश्चित करण्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, एसटीचे विभाग नियंत्रक जगनोर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र, आकाशवाणीचे सतीश पपू, जिल्हा विज्ञान केंद्राचे पत्की, दिव्यांग आयकॉन मुकुंद गोसावी यांचेसह विविध महाविद्यालय व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात नवमतदारांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. युवा, दिव्यांग, स्त्रीया, तृतीयपंथी, स्थलांतरीत नागरीक, शहरी नागरीक, एनआरआय, सेवा मतदार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरीकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणेसाठी सुकाणू समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा. सर्व शासकीय कार्यालय, महामंडळे, सेवाभावी संस्थांनी मतदार नोंदणी वाढण्यासाठी सहभाग नोंदवावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . मतदार नोंदणी कार्यक्रमात 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकाला 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
नंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबतही या बैठकीत चर्चा करुन रुपरेषा ठरविण्यात आली.







