पारोळा – तक्रारीची पोहोच मागितली म्हणुन शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षांना मारहाण करणार्या पोलिसावर कारवाई न केल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना, दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोकणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ.पृथ्वीराज श्रीराम पाटील यांनी प्रसिद्दीस दिली आहे.
शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकर्याने स्वताच्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४ – ५ शेतकर्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यात माधव शिंदे यांच्या पिकाचे ही नुकसान झाले. माधव शिंदे त्या गावचे तंटामुक्ती समितीचे ही अध्यक्ष आहेत. सलोख्याने प्रश्न मिटविण्यासाठी हे सर्व शेतकरी, फवारणी करणार्या शेतकर्याकडे गेले असता तो शेतकरी अरेरावी करत या शेतकर्यांवर कुर्हाड घेऊन धावला. प्रकरण गावात मिटण्यासारखे नाही असे दिसताच, माधव शिंदे व इतर शेतकरी तक्रार नोंदविण्यासाठी दैठणा पोलीस स्टेशन, ता.जि. परभणी येथे गेले. सर्व शेतकर्यांनी आपआपले तक्रारी अर्ज दाखल केल्या नंतर झेरॉक्स प्रतीवर पोहोच मागितली. याचा राग येऊन ड्युटीवर असलेला पोलीस बळीराम मुंडे याने माधव शिंदे यांना शिविगाळ करत, धक्काबुक्की केली व चेहर्यावर दोन जोरदार चापटी मारल्या. अनेक लोकांसमोर हा प्रकार घडला व तेथील सी सी टिव्ही कॅमेर्यात ही सदर घडलेली घटना चित्रित झाली आहे.
दि. २३ जून रोजी घडलेल्या प्राकाराची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे त्याच दिवशी केली असून अपराधी पोलिसावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केली होती. आठवडा उलटला तरी दोषी पोलीसावर कारवाई न करता गुन्हेगार पोलीसाला पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी लक्ष घालून, पोलीसावर निलंबनाची कारवाई व केलेल्या अपराधा बद्दल गुन्हे दाखल न केल्यास, दि. ५ जुलै रोजी दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील सर्व तालुक्यातील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत असून राज्यभारातील शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते कुलुप ठोकण्याच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी तहसीलदार गावंडे व पारोळा पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिली आहे. निवेदन देतांना सचिन भिला पाटील, शेतकरी नेते बाळू नाना पाटील व भिम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे उपस्थित होते.