मुंबई (वृत्तसंस्था) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताने इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इथेनॉल उत्पादन आणि वितरणाबाबत E100 पायलेट प्रोजेक्ट आज (शनिवार) पुण्यात सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे व्हर्च्युअली करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले, येत्या काही वर्षामध्ये भारत इथेनॉलवर आधारित कित्येक प्रकल्प सुरु करेल. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय पेट्रोलियम परिवहन मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मागील वर्षी ऑईल मार्केटींग कंपन्यांनी 21 हजार कोटी रुपयांचे इथेलॉल खरेदी केले आहे. यातील सर्वात मोठा हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळाला. खासकरुन ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. मी ज्यावेळी शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळी मला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसतो. ते बायो फ्युज संबंधीत प्रणाली सहजपणे स्विकारत आहेत. स्वच्छ ऊर्जेसाठी देशात मोठे अभियान सुरु असून याचा फायदा कृषी क्षेत्राला मिळणे स्वाभाविक आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 7 ते 8 वर्षापूर्वी भारतात इथेनॉल बाबत क्वचित चर्चा होत होती. परंतु आता भारताने इथेनॉलला 21 व्या शतकात प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे. आम्ही 2025 मध्ये पेट्रोलमध्ये (Petrol) 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंग करण्याचा संकल्प केला आहे. 2014 पर्यंत 1 ते 1.5 टक्के इथेनॉल वापरले जात होते. सध्या 8.5 टक्के इथेनॉल मिश्रित केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. मोदींनी सांगितले की, 2013-14 मध्ये भारताने 38 कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले होते. आज हा आकडा 8 पट अधिक असून 320 कोटी लिटरवर पोहचले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, वायू प्रदूषण फक्त उद्योगांमुळे होते हे चुकीचे आहे. किंबहूना परिवहन डिझेल जनरेटरचा वापर यामुळे जास्त प्रदुषण होत आहे. भारत सर्वांगीण दृष्टीकोनाने आपल्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.