नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधात आरोप करत महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि आता यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आता नंबर लागला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झाले. परमबीरसिंग घरी गेले अनिल देशमुख यांना तुरूंगात जाण्याची वेळ आली आहे. आत्ता सध्या अनिल परब यांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा सोमय्या यांनी केला आहे. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. राज्यातील सरकारने खुशाल पाच वर्षे पूर्ण करावे पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले.
कोरोना लसीकरणावरून मुंबई मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. सोमय्या यांनी लसीकरणा वरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे सरकार मुळे झालेल्या कोविड हत्याकांडवरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झाले आहे त्याचा आणि लस चा काय संबंध आहे ? असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे भाजपा भविष्यात महाराष्ट्रातील covid-19 मृत्यूचा स्पेशल ऑडिट करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयांच्या लसीकरण झालेले असेल असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.







