मुंबई (वृत्तसंस्था) – अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानी याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. हिंदू देवतांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनातील अंबड भागात राहणारे अंबादास अंबोरे यांनी उस्मानीनं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अंबादास यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलं की, उस्मानीनं ट्विटरवर काही पोस्ट केलेत. त्यात राम यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, उस्मीनच्या ट्विट्समुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
काल रात्री उस्मानीविरोधात भारतीय संविधानानुसार कलम 295-ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास आंबोरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी उस्मानीविरोधात हा गुन्हा दाखल केला. दरम्यान अंबोरे हे हिंदू जागरणशी संबंधित असल्याचं समजतं आहे.
याआधीही शरजील उस्मानी याने हिंदुत्वावर टीका केली आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात उस्मानीनं एल्गार परिषदेत हिंदुत्वावर टीका केली होती. एल्गार परिषदेत त्याने धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे उस्मानीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.
गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानीने वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार १५३ अ कलमाअंतर्गत उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानीवर कारवाई करण्यात यावी यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाल्याचंही पहायला मिळालं. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना उस्मानीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली.