नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा विस्फोट केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला एक विनंती केली आहे. ‘अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की पीआर व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून संकट वाढलं आहे. करोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील करोनाची लागण झालेली आहे.