मुंबई (वृत्तसंस्था) – सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आता लांबणीवर पडणार आहे. सिंधुदुर्गात विमान सेवा सुरू होण्यासाठी आणखी एक ते दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयन समितीने चिपी विमानतळाबाबतीत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
धावपट्टी, पाणी, वीज आणि रस्ता याबाबतीत काही महत्त्वाच्या सूचना आणि सुधारणा समितीने प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. या सूचना आणि सुधारणांची पूर्तता केल्यावर समिती सिंधुदुर्गात येऊन पुन्हा त्याची पाहणी करणार आहे. DGCA समितीचे समाधान झाल्यास विमान सेवेचा परवाना मिळणार आहे. DGCA समितीने नुकतीच सिंधुदुर्गात येऊन विमान सेवा सुरू करण्यापूर्वी चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी केली होती. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात विमानसेवा सुरू होण्याबाबत जिल्ह्यातील शिवसेना नेते आशावादी होते.
चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. माञ 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती.
चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल,” अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली होती.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार, अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.