नवी दिल्ली९वृत्तसंस्था ) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

यातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने पावले उचलले आहे. यानंतर आज पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, ‘राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत.’ हरयाणातील सोनीपत झज्जर आणि पववल जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.







