बीड (वृत्तसंस्था) – राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा थेट चॅलेंज दिलं आहे. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. गंगाखेड शुगर साखर कारखान्याला आकसापोटी परवानगी दिली नाही असा आरोप गुट्टे यांनी केला आहे.

गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. कारखान्याला ऊस घातल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.
गंगाखेड शुगरला ज्या अटी लावल्या आहेत, त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत? असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सरकारने लावलेल्या अटीनुसार राज्यातील एकही कारखाना सुरु होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना चॅलेंज आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असं आव्हानच गुट्टे यांनी दिलं आहे.
राज्यातील कोणत्या कारखान्याने एफआरपीनुसार 15 टक्के व्याज दिलं? कोणत्या कारखान्यानं 15 दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे दिले? असा प्रश्न विचारत आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, नाहीतर तुम्ही राजीनामे द्या, असं गुट्टे म्हणाले. महाराष्ट्रात काही कारखाने विनापरवाना सुरु असल्याचा आरोप करत सिद्धी शुगर आणि अहमदपूर भिमा कारखान्याचा उल्लेख त्यांनी केला.
गंगाखेड शुगर सुरु झाला नाही तर परिसरातील 7 लाख टन ऊश गाळपाअभावी उभा राहिल, अशी भीती गुट्टे यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. पवार साहेब, आपण देशाचे नेते आहात. आपल्या हातानेच पहिली मोळी टाकली आहे. यंदा कारखाना सुरु करुन आपला वाढदिवस साजरा करा, अशी विनंती गुट्टे यांनी पवारांकडे केली आहे.
‘ज्यांच्या कुणामध्ये खुमखुमी आहे त्यांनी आपल्यासोबत भांडण करावं. त्यांनी समोर यावं, आपण लढण्यास तयार आहोत. तुम्ही पालकमंत्री आहात. तुमच्या मेहुण्याची जिरवली, तुमचीपण जिरवू’, अशा शब्दात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट इशारा दिला आहे.







