जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध भागातून चोरीस गेलेल्या दुचाकी चोरून त्याची वाळूज जिल्हा औरंगाबाद येथे विल्हेवाट लावणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्व्हेषण विभागाने शिताफीने औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबतची माहिती पत्रपरिषदेत एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गुरुवारी ५ रोजी दिली.
पोनि बकाले पुढे म्हणाले कीं, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पथके स्थापन करणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे , सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजय शामराव पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईशान तडवी तसेच सहाय्यक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथक स्थापन केले होते.
सदर पथकातील विजय शामराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा येथील रहिवासी जमील आयुब शेख हा शेंदुर्णी व पहूर भागात मोटारसायकलची चोरी करून त्या मोटरसायकलची विल्हेवाट वाळुज, औरंगाबाद येथे लावीत असून तो सध्या वाळुज एमआयडीसी, शहाजापूर औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. त्याप्रमाणे वरील पथकाने औरंगाबाद येथे जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने एमआयडीसी, जळगावसह शेंदुर्णी, पहूर येथे चोरलेल्या १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी मिळून आल्या. त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी पथक औरंगाबाद येथे रवाना झाले आहे.