नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पवारांनी राज्यपालांबद्दल लिहिलेलं हे दुसरं पत्र आहे. यावेळंचं निमित्त हे राज्यपालांवरचं शासनानं प्रसिद्ध केलेलं पुस्तक ठरलं आहे. या पत्रात थेट टीका न करता पवारांनी खास त्यांच्या शैलीत तिरकसपणे राज्यपालांना टोले लगावले आहेत.

शासनाच्या वतीने ‘जनराज्यपाल- भगतसिंह कोश्यारी’ या शिर्षकाचं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. राज्यपालांनी ते पुस्तक सर्वच राजकीय नेत्यांना पाठवलं. शरद पवारांना ते पुस्तक मिळाल्यानंतर त्यांनी हे खरमरीत पत्र लिहून पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली.
पवारांनी पत्राच्या पहिल्याच ओळीत पुस्तकाच्या शिर्षकालाच आक्षेप घेतला. पवार म्हणाले, भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरिही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद.
पुस्तकात एखाद् दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्च पदस्थांच्या गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याची छायाचित्र आहेत. त्यापलिकडे काहीही नाही.
पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरूनही राज्यपालांना सुनावलं. ते म्हणाले, निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही.







