मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप व शिवसेना हे पक्ष मागील २५ ते ३० वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन एकत्र होते. असे म्हणत हे सरकार आम्ही पाडणार नाही. मात्र हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना कळणार सुद्धा नाही, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. तद्वतच, सरकार पडले तर अराजकता माजेल या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मताशी मी सहमत नसल्याचे आठवलेंनी सांगितलं.
आठवले म्हणाले, जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. त्यात काही नवीन करण्याची गरज नाही. जीएसटी पैसे मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पडणार नाही. हे सरकार स्वतः पडेल. असे सांगत भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर बोलणाऱ्या कंगनाला माझा पाठिंबा नसल्याचे त्यांनी नमूद केलं. मुंबईत तिला येऊ देणार नाहीत या मुद्यावर तिला मी पाठींबा दर्शवला होता. बाळासाहेब असते तर कंगना त्यांना भेटली असती आणि तात्काळ विषय मिटला असता. म्हणून कंगनाच्या बाबत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत विषय मिटवून टाकावा, असे आवाहन आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.