
पदवी प्रमाणपत्र जाळले
जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना बेरोजगार ठेऊन विश्वासघात केला आहे असा आरोप करत जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी 17 रोजी दुपारी ‘जबाब दो, रोजगार दो’ आंदोलन शहरातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. म्हणून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची होळी करत मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवला.
सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशवासीयांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. देशातील तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये असतील, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणू, मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातील उद्योगधंदे भरभराटीस आणू, अशी अनेक आश्वासने मोदींनी दिली होती. पण त्यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेले नाही. देशातील तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, असे आश्वासन मोदींनी दिले होते. पण 2 कोटी तर सोडा 2 लाख तरुणांना देखील नोकरी मिळाली नाही. नोटबंदी, जीएसटी अशा चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या गोष्टींचा आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नुसती आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून दिशाभूल केली. ‘नही चाहीये हमे अच्छे दिन, लौटा दो हमारे पुराने दिन’ असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले. या आंदोलनप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची होळी करत मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवला. आंदोलनात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, धनराज जाधव, निशा फेगडे, सोमनाथ माळी, गौरव माळी आदींनी सहभाग नोंदवला.







