मुंबई ;- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत गाडीचं स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे महाविकास आघाडीचा रिमोट असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत, असं शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.

गेले काही दिवस विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असतात अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपलं मत व्यक्त केलं. “धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. प्रशासन घेत नाही. विशेष म्हणजे सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं.
शिवाय, महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहितीही शरद पवार यांनी बोलाताना दिली.
नवा पर्याय नाही, सरकार ५ वर्ष चालणार
सध्या राज्यात कोणताही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे चालेल. देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक कोणालाही नको, असं शरद पवार म्हणाले.
अजित पवारांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. आरोग्यममत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर, अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलं.







