८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह जंगलात लपवला; ३५ दिवसांनी जळगाव पोलिसांनी केली उकल
पारोळा तालुक्यातील करंजी येथील धक्कादायक घटना; संशयित भाचा धुळ्यातून ताब्यात
जळगाव/पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील करंजी येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्धेच्या खुनाचा जळगाव पोलिसांनी तब्बल ३५ दिवसांच्या अथक तपासानंतर छडा लावला आहे. वैजयंती गणपत माळी या वृद्धेचा त्यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी याने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. मुलाप्रमाणे मानत असलेल्या भाच्यानेच आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणातून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी हा घातक कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून रात्री बायपास महामार्गावरील ड्रेनेज पट्टीतील सिमेंटच्या गॅपमध्ये टाकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



वैजयंती गणपत माळी, वय ८५ वर्षे, रा. करंजी, ता. पारोळा या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी त्या घरातून बेपत्ता झाल्या. याबाबत ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा कलम १३८(२) बीएनएस अन्वये गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान वैजयंती माळी यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी हादेखील घटनेनंतर अचानक गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय प्रशांतच्या हालचालींकडे वळला. वैजयंती माळी यांना स्वतःची अपत्ये नसल्याने त्या प्रशांतला मुलाप्रमाणे मानत होत्या. त्या वेळोवेळी त्याला आर्थिक मदत करीत असल्याचेही तपासात समोर आले. मात्र, प्रशांतवर एचडीएफसीचे कर्ज तसेच इतर उधारी असल्याने त्याची नजर वैजयंती यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर असल्याचा संशय पोलिसांना आला.
सीसीटीव्ही फुटेजने तपासाला मिळाली महत्त्वाची दिशा
पोलिसांनी करंजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता प्रशांत करंजी गावात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैजयंती माळी या घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसून आल्या. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रशांतचा कसून शोध सुरू केला. मात्र, तो तब्बल ३५ दिवस फरार राहिला.
दरम्यान, जळगाव पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहिती व मानवी गुप्तवार्तेच्या आधारे प्रशांतचा ठावठिकाणा शोधून काढला. अखेर १२ सप्टेंबर २०२६ रोजी त्याला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता वृद्धेच्या खुनाची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली. पोलिस तपासानुसार, प्रशांतने वैजयंती माळी यांना आपल्या साडूच्या वडिलांचे निधन झाल्याचे खोटे सांगितले. अंत्यविधीसाठी शिरसोली येथे घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना सोबत नेले. त्यानंतर त्याने वैजयंती यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यात वैजयंती एकट्या पडल्या. त्यानंतर मुकटी, धुळेपासून सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर प्रशांतने कापडाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

खून केल्यानंतर प्रशांतने त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो मुकटी येथील घरी गेला व तेथे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दिवसभर मृतदेह कुठे लपवायचा, यासाठी तो परिसरात फिरत राहिला. याचदरम्यान त्याने दुपारी एका सोनाराकडे वृद्धेचे दागिने विकल्याची माहिती तपासात पुढे आली. यानंतर रात्रीच्या वेळी त्याने कारमधून मृतदेह बायपास महामार्गाच्या परिसरात नेला. तेथे ड्रेनेज पट्टीतील सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह टाकून दिला आणि तेथून पसार झाला.
१३ सप्टेंबर रोजी मृतदेहाचे अवशेष सापडले
प्रशांतने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १३ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबविली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष व सांगाडा आढळून आला. त्यामुळे वैजयंती माळी यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उकलले असून, त्यांच्या खुनाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जळगाव पोलिसांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी, मानवी गुप्तवार्तेचा प्रभावी वापर, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक कौशल्य आणि घेतलेले अथक परिश्रम यामुळे ३५ दिवसांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या कारवाईमुळे वृद्धेच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.








