महिला भगिनींकडून बैलांचे औक्षण व पुरणपोळीचा नैवेद्य; भरघोस पावसासाठी शेतकऱ्यांनी वरुणराजाकडे साकडे
बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची आकर्षक सजावट करून त्यांना मिरवणुकीत सहभागी केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात सर्जा-राजाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. घरोघरी महिला भगिनींनी बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली, तसेच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे संपूर्ण पिंप्राळ्यात सणाचे मंगलमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.


शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच भूतदया व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश या सणातून देण्यात आला. बैलपोळा हा शेतकरी जीवनाशी अतूट नाते सांगणारा सण असून, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न यंदाही पिंप्राळ्यात करण्यात आला.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधव-भगिनींनी “भरघोस पाऊस पडू दे, बळीचं राज्य येऊ दे” अशी प्रार्थना करीत वरुणराजाला साकडे घातले. चांगला पाऊस पडून शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उत्सवात माजी सरपंच धरमसिंग पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल भीमसिंग पाटील, रमेश धनगर, प्रकाश कोळी, अशोक पाटील, मयूर धनगर, योगेश धनगर, राकेश कोळी, जयदीप धनगर, ओम धनगर, टेलर, गुमानसिंग राजपूत तसेच अभिजीत पाटील यांच्यासह पिंप्राळा गावातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील सर्जा-राजासह त्यांच्या मालकांचेही उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झालेल्या या बैलपोळ्यामुळे पिंप्राळ्यात ग्रामीण संस्कृती, शेतकरी परंपरा आणि भूतदयेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.









