महाराष्ट्रातील ११० विद्यार्थ्यांचा सहभाग; सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांचे प्रभावी विचारमंथन
जळगाव ( प्रतिनिधी ) – वाकोद, ता. जामनेर : विचारांना व्यासपीठ आणि वक्तृत्वाला दिशा देणाऱ्या श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती वाकोद येथे उत्साहात झाली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि समकालीन विषयांवर प्रभावी वक्तृत्व सादर केले. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. निशा जैन होत्या. वाकोद विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य एस. टी. चिंचोले यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची भूमिका, आयोजनाची पार्श्वभूमी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.
विषय समजून घेत विद्यार्थ्यांचे प्रभावी वक्तृत्व
स्पर्धक विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांसह शिक्षण, पर्यावरण, प्रामाणिकपणा, गुड टच-बॅड टच, पेपरफुटी आदी विषयांवर आपले विचार मांडले. केवळ पाठांतरावर भर न देता विषय समजून घेत स्वतःचे विचार मांडल्याने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला विशेष दाद मिळाली.
यंदापासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक सुरू करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
‘बक्षीस मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका’-
अध्यक्षीय मनोगतात निशा जैन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमधून निवड होऊन तुम्ही येथे सहभागी झाला आहात, हीच मोठी उपलब्धी आहे. केवळ तीन क्रमांक मिळविणारे विद्यार्थीच विजेते नसून येथे सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी विजेता आहे.”
वक्तृत्वातून मांडलेले विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन करताना त्यांनी संत तुकारामांच्या ‘बोलणें बोलें जैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या विचाराचा संदर्भ दिला. प्रामाणिकपणा, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
“तुमच्या हातात भारतमातेचे भविष्य आहे. तुम्ही स्वतः प्रामाणिक राहून व्यवस्था प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला, तर देशाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल,” असे त्यांनी सांगितले.
दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावून घेण्याचा सल्ला देत ‘आज मी काय नवीन शिकलो?’ याची नोंद विद्यार्थ्यांनी दररोज डायरीत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
* श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्याला उजाळा
यावेळी संस्थेच्या सचिवांनी मनोगत व्यक्त करताना भवरलालजी जैन (भाऊ) यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. वाकोदचे नाव देशभर पोहोचविण्यात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत शिक्षण, संस्कार आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीतून अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धेचा निकाल
स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बाल गट:
प्रथम क्रमांक : आकाश राजू जाधव, चाळीसगाव
मार्गदर्शक : नीलेश राजपूत, वाकोद
किशोर गट :
प्रथम क्रमांक : नीरज दीपक वारंगणे, जामनेर
तसेच प्रशांत रवींद्र पाटील, जामनेर यांनीही आपल्या गटात प्रथम क्रमांक .
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या दशकपूर्ती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
याप्रसंगी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सचिव सागरमलजी जैन, सहसचिव यु यु पाटील, परीक्षक ज्ञानेश्वर शेंडे, किशोर कुलकर्णी, रामचंद्र पाटील डॉ. शरद दुगड, प्राचार्य रूपाली वाघ, एस. टी. चिंचोले, प्राचार्य देवेंद्र चौधरी, विनोदसिंह राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन स्पर्धा प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील यांनी केले.











