नशिराबाद (प्रतिनिधी) – अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाने नशिराबाद परिसरात मोठी कारवाई केली आहे.


नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने साती बाजार चौक परिसरात छापा टाकून ३ किलो ५३८ ग्रॅम गांजासह सुमारे २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे यांनी गोपनीय माहिती संकलित करण्याचे निर्देश पथकाला दिले होते.
दरम्यान, नशिराबाद येथील साती बाजार चौक भागात दोन इसम दुचाकीवरून अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २ सप्टेंबरच्या रात्री साती बाजार चौकात सापळा रचला. संशयास्पदरीत्या हालचाली करणाऱ्या राजेश भारत बांटूगे (वय ३१, रा. महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जळगाव) व सुभाष सोमा मराठे (वय ६८, रा. साती बाजार, नशिराबाद) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची व त्यांच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकलची (क्रमांक MH-19-CD-9574) झडती घेतली असता, डिक्कीमध्ये गांजा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचा २१०८ ग्रॅम गांजा, ७१ हजार ५०० रुपये किमतीचा १४३० ग्रॅम गांजा (काड्या व बिया असलेला अर्धवट सुकलेला), ७० हजार रुपयांची मोटारसायकल आणि १२ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपींविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.
नागरिकांनी अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराबाबत माहिती असल्यास पोलिसांना तातडीने कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस अंमलदार गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, प्रशांत विरणारे, गिरीश शिंदे, अनिल देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रविण लोहार, सागर भिडे व विठ्ठल मुंडे यांच्या पथकाने केली.









