तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

पहाटेच्या सुमारास आसोदा-ममुराबाद बायपासवर दुर्घटना
जळगाव: आसोदा ते ममुराबाद बायपास रस्त्यावर सोमवारी पहाटे ३ वाजता तवेरा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
रावेर येथून नाशिककडे निघालेल्या तवेरा गाडीला (क्र. एमएच ४८ पी ०७५५) जळगावकडे येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०५ डीके ५३१४) जोरदार धडक दिली. या अपघातात तवेरामधील शांताराम पाटील यांच्यासह रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन, निखिल पाटील व चालक जितेंद्र सुपलकर गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र शांताराम पाटील यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी सोडवली. याप्रकरणी ट्रक चालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मयत शांताराम पाटील हे मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे शिंदखेडा गावात शोककळा पसरली आहे.








