विरवाडेत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा पोलिसांची कारवाई


ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा | प्रतिनिधी — तालुक्यातील विरवाडे परिसरात बेकायदा गौण खनिज वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. महसूल विभागाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विरवाडे गावाच्या हद्दीत एम.एस.सी.बी. सबस्टेशनच्या आवाराजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी राहुल प्रकाश कोळी (वय २८), गोपाल ऊर्फ विरपाल प्रेमसिंग राजपूत, सुरेश वेळू कोळी, गणेश सुरेश कोळी आणि चेतन रतीलाल भोई, सर्व रा. विरवाडे, ता. चोपडा, जि. जळगाव, हे संशयास्पदरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांमध्ये स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच-१९ बीजी-८८९४) आणि त्याला जोडलेली लाल रंगाची लोखंडी ट्रॉली यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ५ लाख रुपये, ट्रॉलीची किंमत १ लाख ५० हजार रुपये, तर ट्रॉलीमध्ये असलेल्या सुमारे ६ हजार रुपये किमतीच्या गौण खनिज वाळूसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक एक राहुल कोळी हा ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये गौण खनिज वाळू भरून कोणताही पास किंवा परवाना नसताना बेकायदा वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईदरम्यान संबंधितांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी अरेरावीची भाषा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), २२१, ३५२, ३५१(३), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.









