जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी


शासकीय कार्यालये, व्यापाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे सत्र; ओळखपत्राचा धाक दाखवून वसुली सुरुच
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून, शासकीय अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेलचालकांपर्यंत सर्वांनाच ओळखपत्राचा धाक दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणतीही अधिकृत नोंदणी किंवा मान्यता नसताना पत्रकारितेचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या या घटकांवर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांनी तातडीने कारवाई करून लगाम घालावा, अशी मागणी आता नागरिकान कडून जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तोतया पत्रकार दररोज विविध शासकीय कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसतात. अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभाग अशा ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना त्रस्त केले जात आहे. पत्रकारितेचा अथवा प्रसिद्धीचा धाक दाखवून कधी पाचशे तर कधी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून वसुली केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शासकीय कार्यालयांव्यतिरिक्त शहरातील मोठे व्यापारी, उद्योजक, पेट्रोल पंप चालक, दारू विक्रेते, वाईन शॉप, हॉटेल-ढाबा चालक आणि ताडी विक्रेते यांनाही हे तोतया पत्रकार ओळखपत्र दाखवून धमकावत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. अशा प्रकारांमुळे अधिकृत पत्रकारांच्या प्रतिमेलाही तडा जात असून, सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
आरएनआय (RNI) किंवा अधिकृत नोंदणी नसताना केवळ बनावट ओळखपत्रांच्या आधारे दुकानदारी चालवणाऱ्या या तोतया पत्रकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी व्यापक मागणी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकडून व व्यावसायिकांकडून केली जात आहे









