१९ प्रभागांत व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम; ४७ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण, हजारो ठिकाणी अळ्या नष्ट
जळगाव (प्रतिनिधी )- पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. घरभेटी, कंटेनर सर्वेक्षण, पंप फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), अळीनाशक उपाययोजना आणि जनजागृती अशा विविध माध्यमांतून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

महानगरपालिकेने शहरातील सर्व १९ प्रभागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ ते ९ मधील पंप फवारणी पूर्ण झाली असून प्रभाग क्रमांक १० मध्ये काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ ते १९ मधील फवारणी पूर्ण करून पुढील फेरीचे कामही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले आहे.
डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील विविध वस्त्या, कॉलन्या, गावठाणे आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये धूर फवारणी करण्यात आली. राज मालती नगर, शिवाजीनगर, घरकुल, पिंप्राळा, निमखेडी, मेहरूण, खेडीखुर्द, तांबापुरा, सम्राट कॉलनी, विठ्ठल पेठ, सिद्धार्थ नगर, नागसेन नगर यांसह शेकडो परिसर या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पथकांनी २४ जुलै २०२६ पर्यंत शहरातील ४७,७०६ घरांना भेटी दिल्या. या सर्वेक्षणात १,३३० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. तसेच १,३६,९१४ पाण्याची भांडी व कंटेनर तपासण्यात आले असून त्यापैकी १,७९९ कंटेनरमध्ये अळ्या आढळल्या.
याशिवाय ९९,००७ अनुपयोगी पाण्याची भांडी व कंटेनर रिकामे करण्यात आले, तर २,३०८ पाणीसाठे तातडीने रिकामे करून अळीनाशक उपाययोजना करण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रकांचे वितरण केले. पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे, पाण्याच्या टाक्या व कुलर स्वच्छ ठेवणे, निरुपयोगी वस्तूंमध्ये पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि ताप अथवा डेंग्यूसदृश लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आरोग्य निरीक्षक, फवारणी पथके, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित घरभेटी, अळी शोध मोहीम, धूर फवारणी, पंप फवारणी आणि जनजागृतीचे काम सातत्याने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
> “मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिकेच्या मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे आणि डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ‘स्वच्छ परिसर – निरोगी जळगाव’ हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच साध्य होईल.”









