नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर ; ‘दिशा’ समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती देत सर्व प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्षा रक्षा खडसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘दिशा’ समितीच्या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले. सभागृहात महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरभ सहाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमृत योजना, वीजपुरवठा आणि केबल चोरीवर भर
जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश देत, भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दररोज किमान पाच तास नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.
पीक विमा योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी कृषी व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता रक्षा खडसे यांनी अधोरेखित केली. योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी विभागांनी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश
बैठकीत कृषी, नगरपालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण व शहरी रस्ते, बँकिंग सुविधा, कर्जवाटप, वृक्षारोपण तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संभाजीनगर–जळगाव राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
विविध केंद्रीय योजनांचा आढावा
यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, क्रीडा विभागाच्या योजना, दूरसंचार सुविधा, वन विभागाच्या वृक्षारोपण मोहिमा तसेच रेल्वे प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे तातडीने निराकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.









