लग्नाचा आनंद ओसरण्यापूर्वीच पथराडच्या तरुणावर काळाची झेप; भडगाव आणि संभाजीनगरचे दोन मित्रही ठार
धरणगाव/पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक असलेल्या सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवारी (२२ जून) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पाळधी परिसरासह मृतांच्या गावांवर शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नकार्यावरून परतताना झाला घात:
या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पथराड येथील रहिवासी किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८) हे आपल्या वडिलांसह (बाबूलाल राक्षे) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्नकार्याचा सोहळा आटोपून आनंदाने पिता-पुत्र दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. दुर्दैवाने, पाळधीनजीक येताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर प्रचंड वेगाने धडक झाली.
जिल्हा रुग्णालयात मृत घोषित:
धडक इतकी भयानक होती की, किरण राक्षे यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे मित्र रस्त्यावर फेकले गेले. तिघांच्याही डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. तर किरण यांचे वडील बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिके द्वारे जखमी आणि मृतदेहांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले.
मित्रांची सफर ठरली अखेरची:
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे एकमेकांचे घट्ट मित्र होते. ते आपल्या नातेवाईकांना भेटून दुचाकीने जळगावच्या दिशेने परतत असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. याप्रकरणी जळगावच्या रामानंदनगर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास पाळधी दूरक्षेत्र पोलीस करत आहेत.









