गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक
जळगाव महसूल व पोलिसांच्या ‘मॅनेजमेंट’वर गावकऱ्यांचा संताप; दापोरा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव जवळील दापोरा शिवारात काल रात्रीच्या सुमारास वाळू माफियांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा १ वाजेपर्यंत महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करत होते. मात्र, घटनास्थळी २५ ते ३० जणांचा प्रशासकीय ताफा तैनात असतानाही, वाळू माफियांनी शासकीय यंत्रणेला चॅलेंज देत डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कारवाई दरम्यार वाळू माफियांनी दापोरा गावातील नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मध्यरात्री १ वाजेपर्यंत कारवाईचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनाचा २५ ते ३० जणांचा मोठा ताफा रात्री कारवाईसाठी दापोरा येथे आला होता. कारवाई सुरू असतानाच वाळू माफियांनी थेट प्रशासकीय यंत्रणेसमोरच दादागिरी करत काही डंपर पळवून नेण्यात यश मिळवले.
कारवाई सुरू असताना दापोरे गावातील नागरिकही तिथे जमा झाले होते. यावेळी वाळू माफियांनी आणि त्यांच्या गुंडांनी थेट गावकऱ्यांनाच लक्ष्य केले. हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर घेऊन त्यांनी गावकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. या गोंधळात एका ग्रामस्थावर वाळू माफियाने थेट वार करण्याचा प्रयत्न सुध्दा केला, परंतु दैव बलवत्तर म्हणून तो वार हुकला आणि जीवघेणा अनर्थ टळला. या सशस्त्र धाकामुळे गावकऱ्यांना तिथून पळ काढावा लागला.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि महसूलचे अधिकारी हजर असतानाही वाळू माफिया एवढी हिंमत कशी करू शकतात? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. “जळगाव तालुका पोलीस स्टेशन हे पूर्णपणे वाळू माफियांसोबत मॅनेज झाले आहे, म्हणूनच पोलिसांच्या देखत डंपर पळवले गेले आणि गावकऱ्यांवर हत्यारे उगारली गेली,” असा थेट आरोप दापोरा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर दापोरा गावात प्रचंड दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वाळू माफियांची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी दापोरे गावातील नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








