दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात अवैध साठा उघड; महसूल आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त मोहीम
जळगाव ( प्रतिनिधी ) :- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तब्बल १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


गुप्त माहितीच्या आधारे उघड झाला मोठा साठा
मौजे निमगव्हाण येथील दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित वाळू साठा चढ्या दराने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईची सूत्रे हलवली.
पोलीस अधीक्षकांचे थेट आदेश
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने ‘ॲक्शन मोड’मध्ये येत चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) यांना पथकासह घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली, जेणेकरून महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयातून कारवाई प्रभावीपणे पार पाडता येईल.
वाळूचा ‘डोंगर’ पाहून प्रशासनही चक्रावले
पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता, तेथे प्रचंड प्रमाणात वाळू साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार हा साठा सुमारे १७०० ब्रास इतका असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू असून संपूर्ण वाळू साठा जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
लाखो रुपयांच्या साठ्याची चर्चा
जप्त करण्यात येत असलेल्या या वाळू साठ्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची चर्चा प्रशासन आणि स्थानिकांमध्ये सुरू आहे. या साठ्यामागील मुख्य सूत्रधार कोण, वाळू कुठून आणली गेली आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस आणि महसूल विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.
अवैध वाळू व्यवसायावर मोठा आघात
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार सातत्याने समोर येत होती. अशा परिस्थितीत निमगव्हाण येथे झालेली ही कारवाई अवैध वाळू माफियांवर मोठा आघात मानली जात आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे भविष्यात अशा प्रकारच्या अवैध साठेबाजीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









