जळगावातील दिनकर नगर परिसरातील घटना; शनिपेठ पोलिसांची तातडीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- खुनाच्या जुन्या वादातून एका बंद घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील दिनकर नगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने २२ मार्च २०२६ रोजी नितीन नाना काळे याचा पोटात चाकू मारून खून केला होता. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शाम सूर्यवंशी सध्या कारागृहात आहे.
दरम्यान, या खुनाचा राग मनात धरून मयत नितीन काळे याचा भाऊ राजू नाना काळे याने २४ मे २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शाम सूर्यवंशी याची आई लताबाई सूर्यवंशी यांना “आज तुझे घर जाळून टाकेल” अशी धमकी दिली होती.
त्यानंतर आरोपी राजू नाना काळे व त्याचा साथीदार सचिन ज्ञानेश्वर कोळी (दोघे रा. घरकुल, वाल्मिक नगर, जळगाव) यांनी संगनमत करून २५ मे रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास दिनकर नगर येथील शाम सूर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. तसेच घराला आग लावत जाळपोळ केली आणि घरातील सामानाची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ११३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 326(G), 331(4), 324(4), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची गंभीर दखल घेत शनिपेठ पोलिसांनी आरोपी राजू नाना काळे आणि सचिन ज्ञानेश्वर कोळी यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.








