जळगाव, ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील कर्जाने येथील आश्रम शाळेमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दि. १६ तारखेपासून पाच दिवसीय निवासी युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, माध्यामिक मुख्याध्यापक हेमांगीनी बाविस्कर, प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, अर्जून प्रसाद, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे, डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गौऱ्यापाड्या, खाऱ्यापाड्या, वैजापूर व कर्जाने येथील ४४ विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवात करुन महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित संस्कारी पिढी घडविणे, महात्मा गांधींच्या एकादश व्रतांचे पालन करण्याची प्रेरणा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मुख्यध्यापक जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, महापुरुषांकडून काय संस्कार घ्यावे त्यातून आपण समाजासाठी काय करु शकतो याचा विचार केला पाहिजे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. माध्यामिक मुख्याध्यापिका हेमांगीनी बाविस्कर यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आणि श्रमसंस्कारांची जाणीव निर्माण होत असल्याचे सांगितले. अर्जून प्रसाद यांनी अशा शिबीरातून व्यक्तीमत्त्व घडते. ‘स्व’ ची ओळख होत असल्याचे सांगितले. पहिल्या सत्रात गिरीष कुळकर्णी यांनी “युवकांची जबाबदारी, शिबिरातून मिळणारे शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास” या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक मयूर गिरासे यांनी समन्वय साधला. प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत चौधरी यांनी प्रास्ताविक मांडले.









