एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात असलेल्या रुबी पेंट्स कंपनीत झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरातील आंतरराज्य टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांची एअरपोर्ट परिसरात रुबी पेंट्स नावाची कंपनी असून ते तेथेच वास्तव्यास आहेत. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी बोहरा कुटुंबीय बाहेरगावी गेले असता, दि. १५ एप्रिलच्या पहाटे चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील दुर्गम भागात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने मध्य प्रदेश गाठत चाचरीया पाटी व खरगोन परिसरात वेशांतर करून आरोपींवर पाळत ठेवली आणि मोठ्या शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये निलेश उर्फ भुऱ्या माहेरीया डुडवे (रा. धावडा), ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे व ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व रा. चाचरीया पाटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.
जप्त मुद्देमालात सुमारे ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (५,४७,५०० रुपये), ९९ ग्रॅम चांदीचे दागिने (२५,००० रुपये) तसेच ५,७८,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ११,०५,५०० रुपयांचा माल समाविष्ट आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.









