एआय फोटोंद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील भिलपुरा पोलीस चौकी (शनी मंदिर) कडून ममुराबादकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोकेदुखी ठरत आहे. या वर्दळीच्या रस्त्यावरील रेल्वे ब्रिजखाली रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार असल्याने अपघाताची आणि अनुचित प्रकारांची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी सजग नागरिकांनी आता एआय (AI) तंत्रज्ञानाचा आधार घेत सद्यस्थिती आणि संभाव्य बदलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.


रेल्वे ब्रिजखालील भागात पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी तिथे पूर्णतः अंधार असतो. कामावरून घरी परतणाऱ्या महिला, शिकवणीवरून येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अंधारामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढू शकते.
एआय (AI) फोटोंची चर्चा
नागरिकांनी केवळ तक्रार न करता, प्रशासनाला ‘व्हिजन’ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तीन प्रकारचे फोटो प्रसिद्ध केले आहेत:
१. दिवसाची स्थिती: जिथे रस्त्याची दुरवस्था दिसते.
२. रात्रीची स्थिती: जिथे भयाण अंधार दिसून येतो.
३. एआय आधारित बदल: जर तिथे हाय-मास्ट किंवा पुरेसे दिवे लावले, तर तो परिसर किती सुरक्षित आणि सुंदर दिसेल, याचे वास्तववादी चित्र.
नागरिकांची मागणी
“हा रस्ता ममुराबादकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे. ब्रिजखालील अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा छेडछाडीचे प्रकार घडू शकतात. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करावी, हीच आमची मागणी आहे.” या बातमीच्या माध्यमातून संबंधित महानगरपालिका प्रशासन आणि विद्युत विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.









