केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जळगावात प्रतिपादन
‘सरपंच संवाद’ सोहळ्याचा दिमाखात शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी):- “गावचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांच्या निधीवर अवलंबून नसतो, तर तो सर्वस्वी सरपंचांची मानसिकता आणि त्यांच्या विकासाप्रति असलेल्या बांधिलकीवर अवलंबून असतो. सरपंच हाच खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचा कणा आहे,” असे परखड मत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘सरपंच संवाद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

विकासाची धुरा सांभाळताना सरपंचांनी सक्षम असणे किती गरजेचे आहे, हे सांगताना ना. रक्षा खडसे यांनी स्वतःचे उदाहरण दिले. “सरपंच ते केंद्रीय मंत्री” असा आपला थक्क करणारा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या की, जेव्हा एखादा सरपंच गावाचा डेटा (माहिती) आपल्या हाताशी ठेवतो, तेव्हा विकासाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. कार्यक्रमात बोलताना त्यांनी ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित केले. गावाच्या विकासाचे नियोजन हे एसी केबिनमध्ये नाही तर ग्रामसभेत झाले पाहिजे, असे सांगत त्यांनी केंद्र व राज्य सरकार सरपंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दोन दिवसीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील सरपंचांना अधिक ‘स्मार्ट’ आणि ‘सक्षम’ बनवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत.

यामध्ये कविता वारे, सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे ट्रेनर सरपंच आणि विस्तार अधिकाऱ्यांना आधुनिक प्रशासन आणि विकासकामांचे धडे देणार आहेत. हा कार्यक्रम केवळ संवाद नसून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.









