
जळगाव ( प्रतिनिधी ) –संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेल्या नववधूचा माहेरी जाण्याचा प्रवासच अखेरचा ठरला. लग्नाच्या अवघ्या सहाव्या दिवशी जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील वय २१ कोळपिंप्री, ता. अमळनेर) हे जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तर काका प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.









